
रस्त्याची तातडीने दुरुस्तीची प्रवाशांची मागणी : रस्त्यावर चालणे झाले मुश्किल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी शहरातील बाजारपेठ ते दिघंचीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फरशी पुल ते बँक ऑफ इंडिया पर्यंत रस्त्यावर खडी उखडलेल्या रस्त्यावर अक्षरशः चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे वाहनधारक, ये-जा करणारे पादचारी, कॉलेज विद्यार्थी,व वाहनांची वर्दळ असते त्यामुळे याठिकाणहून जाताना छोटे-मोठे अपघात होत आहेत.
बांधकाम खात्याने रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजवण्यात आले होते. तात्पुरता का होईना शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. परंतु या मार्गावरील रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता मुरूम टाकून बसवलेले खड्डे पूर्णपणे उखडलेले आहेत. रस्त्यावरील खडीच निघून गेली आहे. याठिकाणहून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील दगड, इतर प्रवाशी वाहनांना व चालत जाणाऱ्या प्रवाशांना लागत असून, वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
वाहन रस्त्यावरील खडीवर घसरून कधी अपघात होईल याचा नेम नाही तसेच वाहनांना हादरे बसून वारंवार नादुरुस्त होत आहेत. रस्त्याची अशी अवस्था पाहता हेच स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणारे शहर का? असा प्रश्न पडतो . शहरातील अशा बिकट परिस्थितीवर बांधकाम खात्याने उपाय योजना करावी? कारण सहनशक्तीला मर्यादा आहेत. सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक करत आहेत.