
माणदेश एक्सप्रेस न्युज
नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गौतम गंभीरने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, भारत या कृत्याला प्रत्युत्तर देईल.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पण, उघडकीस आल्यानंतरही पाकिस्तान अजूनही म्हणत आहे की, या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा कोणताही सहभाग नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी चौकशीसाठी शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे.