
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सदाभाऊ खोत, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, उपवनसंरक्षक नीता कट्टे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार विशाल पाटील म्हणाले, केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प संबंधित यंत्रणांनी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यत पोहोचवून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आमदार सदाभाऊ खोत यांनी विविध कल्याणकारी शासकीय योजनांतर्गत दिलेली कामे विहित वेळेत व गुणवत्तापूर्ण व शासकीय नियमांनुसार पूर्ण करावीत. जे कंत्राटदार विहीत मुदतीत व दर्जेदार काम करणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ज्या घरकुलांची कामे अपूर्ण आहेत, ती लवकर पूर्ण करावीत, तसेच, बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, कृषी, समाजकल्याण, वैद्यकीय महाविद्यालय मिरज आदि विविध विभागांकडील योजनांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवर व अशासकीय सदस्य यांनी विविध सूचना मांडल्या. या सूचनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून संबंधित यंत्रणांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
प्रारंभी जम्मू काश्मिर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांप्रती दोन मिनीटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली.