“मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा”- संजय राऊत

0
4

विधानसभा निवडणुकीला अवघे 100 दिवस बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला घामटा फोडणारं विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी करतानाच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचं नेतृत्व केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. महायुतीतील इतर घटक पक्ष काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, तो पीळ आम्ही उतरवू

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सरकारवरही टीका केली. नव्या संसदेची आज रीतसर सुरुवात होत आहे. राष्ट्रपतींच भाषण आज होईल. अल्पमताचं सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे, किती थापा मारतंय ते पहावं लागेल. यावेळची लोकसभा ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्याचं प्रतिबिंब हे राज्यसभेत सुद्धा पहायला मिळेल. भाजपने बहुमत गमावलं आहे. कुबड्यांवरचे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट हे आपल्याला पहावं लागतंय असं राऊत म्हणाले. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. आम्ही अजूनही आहोत, हे दाखवण्याचा ( सरकारकडून) प्रयत्न नक्की होईल. पण हा पीळ उतरवण्याचं काम आम्ही करू. हे काम विरोधी पक्षनेते, राहुल गांधी हे नक्की करतील याची आम्हाला खात्री आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत, राहुल गांधी यांच्याबद्दल विश्वास दर्शवला.

खूप वर्षांनी जनतेचा मनातला विरोधी पक्षनेता देशाला मिळाला आहे. त्यांनी पदयात्रा काढून संपूर्ण देश फिरले, देशाचे प्रश्न समजून घेतले. ज्याने गेल्या 10 वर्षांत असंख्य घाव झेलले, अपमानाचे कडू घोट पचवले. ते हलाहल पचवून राहुल गांधींसारखा नेता आज नरेंद्र मोदींसमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे, असे राऊत म्हणाले.

आम्ही किती असली हे दाखवून देऊ

गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारचा टाळकुटेपणा पहायला मिळाला. आम्ही किती असली आहोत, ते आता संसदेत दाखवून देऊ . लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख ‘नकली शिवसेना’ असा केला होता. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. लोकसभेला आता विरोधी पक्षनेता मिळाला आहे. लोकसभेत आता सत्ताधारी-विरोधक असा सामना पहायला मिळेल असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे फार लश्र देण्याची गरज नाही, ते भरकटलेलं व्यक्तीमत्व आहे, अशी जोरदार टीकाही राऊतांनी केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here