
कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ सिनेमा रिलीज झाला आहे. कंगना आता केवळ अभिनेत्री नाही तर भाजपाची खासदार आहे. या पदावर असताना तिचा ‘इमर्जन्सी’ सिनेमा रिलीज होतो म्हणल्यावर यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविषयी आगपाखड केली असणार असं तुम्हालाही वाटत असेल तर थांबा… सिनेमाचं नाव ‘इमर्जन्सी’ असलं तरी यामध्ये इंदिरा गांधींची भावनिक बाजू दाखवण्यात आली आहे.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. १९१७ ते १९८४ हा त्यांचा जीवनप्रवास. १९६२ साली चीन-भारत युद्धात इंदिराचं झालेलं कौतुक, त्यानंतर इंदिरा आणि वडील पंडित जवाहरलाला नेहरु यांच्यातील मतभेद, इंदिरा आणि पती फिरोज गांधी यांच्यात उडणारे खटके, आपली आई कमला नेहरु यांना वाईट वागणूक मिळत असल्याचा मनातला राग ही इंदिरा गांधींची कधीही न पाहिलेली बाजू सिनेमात दिसते. ‘गुंगी गुडिया’ असं त्यांना स्वत:च्याच पक्षातील लोक मागून बोलायचे तेव्हा त्यांचा संयम ते पंतप्रधान बनवण्यापर्यंतचा प्रवास दिसतो. भारत-पाक युद्ध, अमेरिका, फ्रान्स, लंडन या देशांतील राष्ट्राध्यक्षांना दिलेलं चोख उत्तर ही त्यांची जमेची बाजू्. मात्र १९७५ पासून २१ महिन्यांसाठी इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या ‘आणीबाणी’मुळे त्या देशासाठी ‘व्हिलन’ ठरवल्या जातात . विरोधी पक्षातील जयप्रकाश नारायण(अनुपम खेर), अटल बिहारी वाजपेयी(श्रेयस तळपदे), जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या आंदोलनकर्त्यांना बळजबरी तुरुंगात टाकणं ते सामान्यांवरील अत्याचार. धाकटा मुलगा संजय गांधी यांची तानाशाही, नसबंदी सारखा घेतलेला निर्णय, देशात भीतीचं वातावरण हे सर्व पैलू सिनेमात दाखवण्यात आले आहेत.
नाव ‘इमर्जन्सी’ असलं तरी हे सर्व प्रसंग अगदी कमी दाखवण्यात आले असून इंदिरा गांधींची यावेळी मानसिक स्थिती कशी होती यावर जास्त प्रभाव टाकण्यात आला आहे. इथेच सिनेमा थोडा इंदिरा गांधीच्या बाजूने झुकल्यासारखा वाटतो. यानंतर भाजपाची सत्ता पाडून इंदिरा गांधींचं पुन्हा सत्तेत येणं, संजय गांधींना दूर ढकलणं, त्यांचा मृत्यू ते राकेश शर्माची अंतराळ झेप हे सर्व प्रसंग एकामागोमाग एक दिसतात.