
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, हा सेवा हक्क अधिनियमाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, तहसीलदार अमोल कुंभार, रंजना बिचकर आणि लीना खरात आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, सेवा हक्क अधिनियमाची पारदर्शकता, उत्तरदायित्त्व, कार्यक्षमता आदि उद्दिष्टे शासकीय विभागांनी लक्षात घ्यावीत. महाराष्ट्रात हा कायदा प्रभावी असून, यातून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने कार्यवाही करावी. सामान्य नागरिकांना पूर्ण कार्यक्षमतेने, तत्परतेने व सौजन्याने सेवा द्याव्यात. सेवा हक्क अधिनियम पंधरवड्यात प्राप्त झालेल्या व होणाऱ्या तक्रारींची संख्या शून्य व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार अमोल कुंभार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थितांनी सेवा हक्क अधिनियमांतर्गत शपथ घेतली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदि मोठ्या संख्येने सहभागी झाले.