
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : अक्षय तृतीयेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह होत असतात. त्या विवाहामध्ये बाल विवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर तसेच बाल संरक्षण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, भारतात बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अंमलात आला. या कायद्यानुसार वधु-वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो. बाल विवाह केल्याने मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन होते. तसेच, बाल विवाह झालेल्या मुलीचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या सा-यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. बाल विवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात रोखणे संदर्भात शासनाने सर्व प्रकारचे पाऊल उचलले आहे.
बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांनी चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन केल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच व सदस्य सचिव या अंगणवाडी ताई असतात. या ठिकाणी माहिती देवू शकता. तसेच शहरी भागामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असल्याने बाल विवाह होत असलेबाबतची माहिती यांना देण्यात यावी.
बाल विवाह रोखल्यानंतर बाल कल्याण समिती, सांगली यांच्याकडे बालकांना वयाच्या पुराव्यासह हजर केले जाते. त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्यात येते. तसेच, या प्रकरणामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी ताई तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे मार्फत गुन्हा नोंद करण्यात येतो.