
माणदेश एक्सप्रेस न्युज : Air India : इस्रायलमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुथी बंडखोरांनी रविवारी सकाळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तेथे तेल अवीवला जाणारे विमाने दुसरीकडे वळवण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
दिल्लीवरून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबीमध्ये वळवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं हे विमान आता अबू धाबीमधूनच दिल्लीला परतणार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया ६ मे पर्यंत तेल अवीवला जाणारी उड्डाणे स्थगित केले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, येमेनस्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यामुळे या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना तेल अवीव विमानतळ प्रवासासाठी सुरक्षित नाही असा इशारा हुथींनी विमान कंपन्यांना दिला आहे. दरम्यान, गाझामधील इस्रायलच्या लष्करी हल्ल्यामुळे हुथी इस्रायलवर हल्ले करत असल्याचं बोललं जात आहे.
रविवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे तेल अवीव विमानतळावरील उड्डाणांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे येथे होणारे काही उड्डाणे इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. दिल्लीवरून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे AI139 हे विमान वळवावं लागलं आहे. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार बोईंग ७८७ ने चालवलं जाणारं हे विमान जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात होतं आणि तेल अवीवपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर होतं, तेव्हा हे विमान अबू धाबीला वळवण्यात आलं.
एअर इंडियाने काय म्हटलं?
आज सकाळी तेल अवीवमधील घडामोडींमुळे आमच्या ग्राहकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवला जाणाऱ्या विमानांची सेवा ६ मे पर्यंत बंद राहील. तसेच आमचे सहकारी ग्राहकांना मदत करत असून पर्यायी व्यवस्था करण्यात मदत करत आहेत. ४ ते ६ मे या दरम्यान वैध तिकिटांसह आमच्या फ्लाइट बूक केलेल्या ग्राहकांना रीशेड्युलिंगवर एक वेळ सूट दिली जाईल किंवा रद्द केल्यास पूर्ण परतावा दिला जाईल. आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की एअर इंडियामध्ये आमच्या ग्राहकांची आणि क्रूची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य आहे”, असं म्हटलं आहे.