
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली आंबा महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक 8 मे ते 12 मे 2025 अखेर वसंतदादा स्मृतिभवन , वसंत मार्केट यार्ड सांगली येथे केले आहे. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते दिनांक ८ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॅा. सुभाष घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
आंबा महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत. उत्पादक शेतकरी स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंबा फळे पिकास बाजारपेठ मिळणार आहे. उत्पादक ते ग्राहक यांच्यात या निमित्ताने थेट संवाद होणार आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सांगली नगरीतील नागरिकांना उत्तम दर्जाचे, अस्सल नैसर्गिकरित्या पिकविलेले हापूस व केशर आंबे उपलब्ध होणार आहेत. या आंबा महोत्सवाचे आयोजन 8 मे ते 12 मे या पाच दिवसाच्या कालावधीत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत केले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॅा. घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.