
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राजकारणात याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत बरीच मतमतांतरेही पाहायला मिळत आहेत. मनसेतीलच काही नेते या आघाडीबाबत अधिक उत्सुक नसल्याचे दिसत आहे. तर ठाकरे गटाकडून या युतीबाबत सकारात्मकता असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
शरद पवार यांनी राज-उद्धव एकत्र आले तर चांगले आहे, असे म्हटले. यावर, शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. राज ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण या भावना आहेत. या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे या विषयावर सकारात्मक आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
मी याआधी देखील सांगितले की, राजकारणात तत्वाचे असो किंवा विचाराचे असो मतभेद असू शकतात. त्यामुळे कोणी एकत्र येत असेल तर काहीही हरकत नाही. आता राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा विचार केला, तर त्यांना एक परंपरा आहे. त्यांच्या आजोबांपासूनची ती परंपरा आहे. पुरोगामी विचारांचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे आजोबा परिचित होते. शेवटी जर जनतेच्या हितासाठी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर आनंद आहे. पण ते पुरोगामी विचारांना आणि लोकशाहीला जपण्यासाठी एकत्र यावेत, अशी अपेक्षा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.