“घटना दुर्दैवी, ‘रेल्वे’कडून अपघाताची चौकशी सुरू”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

0
158

माणदेश एक्सप्रेस न्यूज | ठाणे– मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान रविवारी सकाळी एक भीषण रेल्वे अपघात घडला. धावत्या फास्ट लोकलमधून आठ प्रवासी ट्रॅकवर पडले, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उर्वरित तीन जखमींवर ठाणे सामान्य रुग्णालय व शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

ही घटना दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना घडली. कसाऱ्याकडे जाणारी लोकल आणि सीएसएमटीकडे जाणारी दुसरी लोकल एकाच वेळी एकमेकांना ओलांडत असताना अचानक काही प्रवासी लोकलमधून खाली पडले. अपघातातील मृतांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली आणि चौकशीचे आदेश
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले :
“दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रेल्वे विभागाकडून अपघाताची चौकशी सुरू असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.”

 

स्थानिक प्रशासन आणि रेल्वेची तत्परता
घटनास्थळी रेल्वे प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाल्या. रुग्णवाहिकांद्वारे जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कसारा फास्ट लोकलमधील गार्डने अपघाताची माहिती दिल्यानंतर तातडीने मदत पोहोचवण्यात आली. अपघाताची चौकशी सुरू आहे.”

 

अपघाताचे संभाव्य कारण – ट्रेनमधील प्रचंड गर्दी
या दुर्घटनेमागे ट्रेनमध्ये असलेली अतिगर्दी आणि प्रवाशांचे दरवाजाजवळ उभे राहणे हे संभाव्य कारण मानले जात आहे. प्रवाशांनी अधिक सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here