
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : IPL चा इतिहास बदलणारी रात्र ठरली कालची! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अखेर आपल्या चाहत्यांच्या आणि संघाच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. तब्बल 18 वर्षांनंतर RCB संघाने आपली पहिली IPL ट्रॉफी पटकावत इतिहास रचला. याचसोबत, संघाचा आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीच्या 17 हंगामांच्या प्रतीक्षेलाही पूर्णविराम मिळाला.
कालच्या थरारक अंतिम सामन्यात RCB ने पंजाब संघावर 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामना संपताच विराट कोहली भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. आणि आज सकाळी विराटने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या – जी काही क्षणातच व्हायरल झाली.
विराट कोहलीची पहिली पोस्ट – आठवणींचा पाझर
“आयपीएल ट्रॉफीबद्दल मी काय बोलू… मित्रा, ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू 18 वर्षं वाट पाहायला लावलीस. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे!” – अशा शब्दांत विराटने आपले मन मोकळे केले. त्याने चाहत्यांना दिलेल्या या भावनिक संदेशात ट्रॉफीसहचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
विराटने पोस्टमध्ये म्हटले:
“या संघाने स्वप्न साकार केलं. हा सीझन मी कधीही विसरणार नाही. हे ट्रॉफी आमच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे, आणि त्या चाहत्यांसाठी आहे, जे आम्हाला कधीच सोडून गेले नाहीत.”
विराटच्या दमदार कामगिरीचा प्रभाव
IPL 2025 च्या हंगामात विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. 15 सामन्यांमध्ये 657 धावा, त्यात 8 अर्धशतकं, 54.75 सरासरी, आणि 144.71 स्ट्राईक रेट – यामुळेच RCB ला विजेतेपद मिळवता आलं. त्याच्या या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो का क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो.
मैदानावर जल्लोष आणि इतिहासाचा साक्षी
सामना संपताच संपूर्ण RCB संघ, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांनी एकत्र जल्लोष साजरा केला. मैदान ‘RCB… RCB…’ च्या घोषणांनी दुमदुमलं. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे माजी खेळाडूसुद्धा या क्षणाच्या साक्षीदार ठरले.