
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाणे निर्मिती संदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्वे व अटी, शर्थी स्पष्ट केली आहेत. त्याच धर्तीवर सावळज येथे दुसरे स्वतंत्र पोलीस ठाणे उभा करा. याकडे लोकप्रतिनिधी व गृहविभागाचे लक्ष वेधण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक सावळज पोलीस ठाणे उभे करीत जनतेच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हंटले आहे.
यावेळी तहसीलदार पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तासगाव तालुक्यात एकच पोलीस ठाणे असून त्याची स्थापना ब्रिटिश काळातील जवळपास 1917 सालची आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षांहुन अधिक काळ लोटला. तरी दुसरे पोलीस ठाणे उभारण्यात अनेक लोकप्रिनिधींना यश आलेलं नाही.तासगाव तालुका संवेदनशील आहे. गेल्या दशकभरात वाढत्या लोकसंख्येसह गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली स्पष्ट दिसत आहे.
तालुक्यातील 69 गावातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे शिवधनुष्य एकटे तासगाव पोलीस ठाणे उचलीत आहे. परंतु काळाच्या ओघात वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी पाहता एकट्या तासगाव पोलीस ठाण्यावर कामाचा ताण-तणाव प्रचंड आहे. तरी ठाण्यातील अधिकारी व उपलब्ध तुटपुंजे कर्मचारी जनतेला न्याय देण्यासाठी धडपडत आहेत.
तालुक्यात सावळज, मांजर्ड, येळावी येथे पोलीस आऊट-पोस्ट आहेत .परंतु त्यांचा नागरिकांना अपेक्षित लाभ होत नाही. तालुका पूर्व भागातील जरंडी, सावळज, अंजनी, लोकरेवाडी, यमगरवाडी, दहिवडी, सिद्धेवाडी, जरंडी पत्रा, डोंगरसोनी गावातील नागरिकांना 20 ते 42 किमी अंतरावरून तासगावला यावे लागते. 112 क्रमांकावर नोंदविलेल्या तक्रारीच्या ठिकाणी वेळेत पोचणे पोलिसांना शक्य होत नाही.
तेव्हा सावळज पूर्व भागातील जनतेच्या सोयीसाठी तात्काळ सावळज येथे गृहविभागाने नवीन पोलीस ठाणे मंजूर करावे. अन्यथा मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे. यावेळी नितीन जाधव, अनिल लोंढे, पंकज गाडे, प्रमिला गावडे, श्रुष्टी कांबळे, अक्षय दोडमणी, सोनू हंकारे आदी उपस्थित होते.