
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. मनसेने दिलेल्या सकारात्मक संकेतांनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सूचक विधान केले. “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल,” असे म्हणत त्यांनी युतीच्या चर्चेला उधाण आणले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनसे-शिवसेना युतीवर स्वागतार्ह प्रतिक्रिया दिली आहे.
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर आनंदच आहे. कोणत्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर ते स्वागतार्ह आहे. हा त्यांचा अंतर्गत विषय असला, तरी सशक्त लोकशाहीसाठी असे निर्णय महत्त्वाचे असतात.”
त्याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या “राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का?” या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “ते महाविकास आघाडीत येणार असतील, तर आम्ही का त्यांचे स्वागत करणार नाही? आता पाहूया पुढे काय होते. महाराष्ट्राच्या हितासाठी जर ते पाऊल उचलले गेले, तर मी निश्चितपणे त्याचे स्वागत करेन.”
शिवसेनेत झालेल्या फाटल्यानंतर ठाकरे बंधूंनी कधीही एकत्र येण्याचे संकेत दिले नव्हते. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसेकडूनही विरोधकांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली, तर ती राज्याच्या आगामी राजकारणात मोठी घडामोड ठरू शकते.
“बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभा केलेला पक्ष दुर्दैवाने तुटला. पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील, तर ती आनंदाची बाब आहे,” असेही सुळे यांनी म्हटले. राज ठाकरे महाविकास आघाडीत अधिकृतपणे सामील होतात की फक्त शिवसेनेशी मर्यादित युती करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या नजरा आता ठाकरे बंधूंच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत.