विकास दर वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून दिलासा; खाद्यतेल स्वस्त होणार

0
140

कच्च्या खाद्यतेलावरील सीमा शुल्कात 10 टक्क्यांची कपात; 31 मेपासून अंमलबजावणी

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | नवी दिल्ली : देशाचा विकास दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यांच्यावरच्या सीमा शुल्कात 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे बाजारातील खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

 

या निर्णयामुळे सीमा शुल्क 20 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांवर आले आहे. परिणामी, तिन्ही तेलांवरील एकूण आयात शुल्क 27.5 टक्क्यांवरून 16.5 टक्क्यांवर घसरले आहे. हा निर्णय 31 मेपासून लागू होणार आहे.

 

भारतीय बाजारपेठेवर परिणाम
भारत आपल्या गरजेच्या 70 टक्क्यांहून अधिक वनस्पती तेलाची आयात करतो. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल, तर अर्जेंटीना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. त्यामुळे आयात शुल्कात कपात झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात घट अपेक्षित आहे.

 

दरवाढीचा मागील ट्रेंड
गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या दरात चढउतार झाले होते.
शेंगदाणा तेलाचे दर 190.44 रुपयांवरून 188.47 रुपयांवर आले,
तर मोहरी, वनस्पती आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत अनुक्रमे 1.64, 1.6 व 0.82 रुपयांची वाढ झाली होती.
सूर्यफूल तेलाच्या दरात मात्र कोणताही बदल नव्हता.

 

जनतेला दिलासा मिळणार
सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात लवकरच खाद्यतेलाचे दर घटतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here