
उन्हाळ्यात तापमानाचा पारा जास्त असतो. यामुळे या ऋतुत आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा इतर अनेक पेय पितो.
उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा बाजारात आपल्याला ताक, निरा, लिंबू पाणीवाले पाहायला मिळतात. लिंबू पाणी प्यायल्याने आपली तहान जरी जात नसली तरी आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात. कडाक्याच्या उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी लिंबू पाणी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात आहे. जे शरीराला ऊर्जा देऊन डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यास मदत करतात. परंतु, उन्हाळ्यात योग्य वेळी आपण लिंबू पाणी प्यायला हवे, ज्यामुळे आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही.
लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ
1. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि चयापचय सुधारते.
2. जेवणापूर्वी ३० मिनिटांआधी लिंबू पाणी प्यायल्याने ते पाचक एंजाइम सक्रिय करते. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
3. व्यायाम केल्यानंतर किंवा उन्हातून आल्यानंतर लिंबू पाणी प्यायाल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरुन निघते. उन्हाळ्यात दिवसा लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहाते.
4. रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने आम्लपित्त किंवा वारंवार लघवी येण्याची समस्या वाढते.
लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबात असलेले सायट्रिक ॲसिड पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पोटफुगीच्या समस्यांपासून आराम देते.
व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेले लिंबू पाणी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. ज्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
लिंबू पाणी चयापचय गतिमान करते आणि शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते.
लिंबू पाणी प्यायाल्याने यकृत स्वच्छ होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि खनिजे कमी होतात. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहाते आणि थकवा कमी येतो.