![कांदा](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2024/06/कांदा.jpg)
निवडणुका संपताच महागाईची झळ सर्वसामान्यांना नेहमी भेडसावत असते. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा पहायला मिळत आहे. देशात लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली. निवडणुक पार पडेपर्यंत सगळे व्यवस्थित असतानाच आता कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. बाजारात कांदाचे दर हे 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खीसा चांगलाच गरम होणार आहे.
काही दिवसांपूर्वी लसूणाचे दर वाढले होते. त्या दरम्यान बटाट्याच्या किमती देखील वाढल्या होत्या. आता कांदा महागला आहे. त्यामुळे, स्वयंपाकघरात गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या देशात कांद्याची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत कांदा कमी पडत असल्याने महागाईची परिस्थीती उद्भवत आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरात लक्ष घालून किमती कमी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
नाशिकच्या लासलगाव बाजारात कांद्याच्या घाऊक किमतीत मोठी वाढ झाली आहे. काल १० जून रोजी बाजारात सरासरी घाऊक दर प्रतिकिलो २६ रुपये होता. कांद्याचा हाच दर मागील महिन्यात २५ तारखेला प्रतिकिलो १७ रुपये होता. राज्यातील अनेक ठिकाणी घाऊक बाजारात कांद्याचे दर ३० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत.
पुरवठा कमी असल्याने दर वाढले
मागणी जास्त आणि पुरवठा कमी असणे हे कांदा दर वाढीचे मुळ कारण आहे. सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. कारण जून महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठ्याचा आहे. २०२३-२४ मध्ये रब्बी पिकाला कदाचित पावसाचा फटका बसण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे कांद्याचा दर वाढण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळेच शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.