लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, संध्याकाळी 5 वाजता ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

0
3

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेत त्यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पाठवले होते.आमदार गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. माजी मंत्री अर्जुन खोतकर, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे देखील चर्चेसाठी उपस्थित होते.

या भेटीनंतर संध्याकाळी 5 वाजता ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.या शिष्टमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, विजय वडे्टीवार, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे. तसंच लक्ष्मण हाकेंच्या 4 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश असेल. तर हाके यांनी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यात चर्चेला सुरुवात झाल्यावर शिष्टमंडळाकडून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना कागदपत्र देण्यात आले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “हाके यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक चर्चा केलीय. यातून मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. आम्हाला हाके यांच्या तब्येतीची काळजी आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच्या सोबत चर्चा केली. सरकार तुमच्या पाठीशी आहे.”

ते पुढे म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. आपण मुंबईला जाऊ, तिथे आपण चर्चा करू. आपल्याला अपेक्षित असलेले उत्तर आपल्याला मिळेल. आपण आपले 5/7 लोक मुंबईला चर्चेला पाठवावेत.”

लवकरात लवकर आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. दोन्ही उपोषणकर्त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांची नावे द्यावीत. चर्चेतून प्रश्न सुटेल असं ही महाजन यावेळी म्हणाले.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आल्याच्या पार्श्वभूमीवर म्हटलंय की, “आम्ही गेले 8/9 दिवस महाराष्ट्र सरकारकडे भूमिका मांडत आलोय. शासन म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आंदोलनकर्ते म्हणतात आम्ही आधीच ओबीसी आरक्षणात आहोत.”

हाके पुढे म्हणाले की, “दोघांपैकी खरं कोण, दोन्ही एकाच वेळी खोटं बोलू शकत नाहीत. ग्रामीण भागातील ओबीसी समाज नाराज आहे. एक दरी या माध्यमातून निर्माण केली जातेय. ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकारने रेड कार्पेट घालू नये, आमचा आरोप आहे.”यावेळी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावं अशी मागणी केलीय.लक्ष्मण हाके बोलत असताना ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ घोषणांनी परिसर दणाणला.