कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या! महापौर आणि उद्योगपतीच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल

0
132

माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे लिहिल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल झालेला असताना आता जळगाव आणि नाशिकमध्येही पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील खार पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली.

 

‘ठाणे कि रिक्षा’ असे शीर्षक असलेले गीत कुणाल कामराने लिहिले आणि सादर केले. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. कुणाल कामराला अटक करण्याची मागणी होत आहे.
दरम्यन, कुणाल कामराविरोधात जळगाव आणि नाशिकमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. जळगावच्या महापौरांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

नाशिकमध्ये दोन गु्न्हे दाखल झाले आहेत. एका हॉटेल व्यावसायिकाने आणि एका उद्योजकाने तक्रार दिली होती. त्यावरून नाशिक पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, असे खार पोलिसांनी सांगितले.

 

मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराला तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. चौकशी हजर राहण्यास सांगण्यात आले असले तरी कुणाल कामरा अद्याप हजर झालेला नाही. मुंबई पोलिसांनी २७ मार्च रोजी तिसरे समन्स बजावले असून, ३१ मार्च रोजी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.

 

दरम्यान, मुंबई पोलिसांचे समन्स मिळताच कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्रात जाऊ शकत नाही. पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते. त्याचबरोबर मला धमक्या दिल्या जात असून, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मुंबईतील न्यायालयात जाऊ शकत नसल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here