
माणदेश एक्सप्रेस न्युज
कवठेमहांकाळ : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्र सांगली, कृषि विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सहदेव गुरव, आयसीएआर च्या अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बारामती येथील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. सुधीर कुमार मिश्रा, कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूरचे मुख्य वैज्ञानिक डॉ. विपीन वाले, मृदा वैज्ञानिक शैलेश पाटील, कृषि विस्तार वैज्ञानिक सचिन कोल्हे व डॉ. अभिजित बाराते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुधीर मिश्रा यांनी “दामिनी” आणि “मेघदूत” या मोबाईल अॅिप्सचा हवामान आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात पिकांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक माहितीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. विपीन वाले यांनी जनावरांच्या प्रजनन चक्राचे योग्य ज्ञान शेतकऱ्यांना असणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले. शैलेश पाटील यांनी मृदा व जल परीक्षणावर आधारित खत वापराची गरज अधोरेखित केली. मका पिकावरील फॉल आर्मीवर्म या किडीचा वाढता धोका, त्यावर नियंत्रणाच्या पद्धती, तसेच जैविक भाजीपाला व धान्य उत्पादनाचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कुचीतील प्रगतशील शेतकरी मोहन पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सेंद्रिय शेती प्रशिक्षणाबद्दल विशेष आभार मानले. गावातील शेतकरी गट, महिला शेतकरी व ग्रामस्थांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ही विशेष बाब ठरली.