भाजपसह महायुतीच्या नेत्यांचा अंतिम टप्यात ‘बाहेर एक आत एक प्रचार’ ; निवडणुकीनंतर त्यांचा हिशोब चुकता करणार : संजयकाका पाटील

0
4

सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी अंतिम टप्यात ‘बाहेर एक आत एक प्रचार’ केला आहे. परंतु निवडणुकीनंतर त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा भाजपचे खास. संजयकाका पाटील यांनी आज दिनांक १५ रोजी झालेल्या पत्रकार बैठकीत दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच खा.संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तीन महिन्यापूर्वी भाजप कोअर समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती.

मात्र कोअर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखविला. त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबाबत प्रथमपासूनच शंका होती, ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली. त्यामुळे आपण या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही.

मात्र भाजपसह महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक अन बाहेर एक असा प्रचार केला. या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं अन आताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते, याची संपूर्ण कल्पना आली होती. या सर्व शक्यता गृहीत धरुनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो.

विरोधी उमेदवारही अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करण्यात व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीसा यशस्वी ठरला. तरीही सर्वसामान्य मतदाराच्या पाठबळावर एक लाखाहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावाही खा. पाटील यांनी केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here