
माणदेश एक्सप्रेस/पुणे : कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केटयार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.
येत्या काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे. नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ ६० टक्के झाले असून, हंगाम उशीराने सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातून तीन ते चार हजार पेट्यांची आवक झाली होती. कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक झाली आहे.
आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. चार ते आठ डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार १५०० ते ४५०० रुपये दर मिळाले आहेत. एक डझन तयार हापूसला प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. हापूसची आवक वाढली असून, दरात घट झाली आहे. यंदा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी हंगाम साधारणपणे ३० जूनपर्यंत सुरू असतो. यंदा हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डातीलआंबा व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.