“नव्या चेहऱ्यांना संधी द्या”; जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी

0
97

माणदेश एक्सप्रेस न्यूज |पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठा राजकीय संकेत मिळाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षातील जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्ता केली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या वर्धापन सोहळ्यात त्यांनी नवे संकेत देत म्हणाले, “मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आली आहे.”
यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्याकडे थेट विनंती करत सांगितले की, “आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्यात यावे. पक्षात नव्या नेतृत्वाची गरज आहे.”

 

पाटील पुढे म्हणाले, “शरद पवार साहेबांनी मला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. पण आता पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज आहे. पुढील वाटचालीसाठी हा बदल गरजेचा आहे.” जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पाटील यांना आपले भाषण लवकर संपवावे लागले.

 

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख करत सांगितले की, “एकेकाळी केवळ दोन खासदार असलेला भाजप आज देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आपण घाबरू नये. ताकदीने काम केले तर ही लढाई आपण जिंकू शकतो. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत.” जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here