मध्यरात्री पाकिस्तानात घुसले, 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी

0
233

भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं काल (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:05 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:30 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले.

 

 

भारताकडून 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

 

2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

 

3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

 

4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी

 

5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

 

6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

 

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर

 

8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर

 

9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

 

‘ऑपरेशन सिंदूर’ची वैशिष्ट्ये
1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले

 

 

राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र-

1. पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर
2. राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र
3. अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र
4. 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता
5. 1 हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल करतं मारा
6. शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हल्ला यशस्वी

 

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरची एक-एक गोष्ट सांगितली-

पाकिस्तानात 100 किमी आत घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला, अशी माहिती भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरनंतर दिली. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा पुराव्यांसह बुरखा फाडला. लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.

 

 

ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?
संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.

 

पंतप्रधान मोदी स्वत: मॉनिटर करत होते ‘ऑपरेशन सिंदूर’-
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तथापि, हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.

 

 

ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे. या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानकडून बदला घेण्याच्या वल्गना-
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद ‘तात्पुरता आनंद’ असल्याची प्रतिक्रिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की ‘याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.’ISPR च्या अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ‘पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल’ आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला ‘अनुत्तरीत सोडले जाणार नाही’.’भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद… पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत. सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत,’ असे आयएसपीआरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे. ‘पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल. ते अनुत्तरीत राहणार नाही. भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुःखाने घेतली जाईल,’ असे त्यात म्हटले आहे.

 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार-
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. या गोळीबारमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.

 

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अमेरिकेने काय म्हटले?
भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here