![००००](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2024/05/००००.jpg)
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये 5 दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी बाळाला थेट सूर्यप्रकाशात ठेवल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरच्या आणि नातेवाईकांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या बाळाने जीव गमावला. घटनेनंतर डॉक्टरांनी आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातून पळ काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मैनपूरीच्या घिरोर ठाणे परिसरात घडली. मैनपूरीतील राधारमण रोडवर असलेल्या साई हॉस्पिटलमध्ये रिटा नावाच्या महिनेने पाच दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या दिवसापासून तिला काही त्रास होता, त्यामुळे डॉक्टरांनी बाळाच्या नातेवाईकांना दररोज अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला.
कुटुंबियांनी बाळाला हॉस्पिटलच्या टेरेसवर नेले आणि सुमारे 30 मिनिटे थेट सुर्यप्रकाशात होती. काही वेळाने कुटुंबाच्या लक्षात आले की, बाळ कोणतेही हालचाल करत नाही. तीव्र उष्णतेमुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला. असे सांगण्यात येत आहे की, 42 अंश सेल्सिअसच्या आसपास उष्णता होती. बाळाच्या मृत्यूनंतर कुटुंबायांनी डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. घटनेनंतर डॉक्टर आणि काही वैद्यकिय कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाले. डॉक्टरांच्या दिलेल्या सल्ल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला अशी तक्रार कुटुंबानी पोलिसांत केली आहे.
बाळाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने रुग्णालयात प्रशासनाचा निषेध केला आहे. सीएमओच्या आदेशानुसार, रुग्णालय सील करण्यात आले असून डॉक्टरांविरोधात चौकशी सुरु करण्यात येणार आहे. डॉक्टर फरार असल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहे.