
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या मागील भागात सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. सदर आगीत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसले तरी, परिसरातील मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी-दिघंची रस्त्यालगत आटपाडी उपविभाग अंर्तगत महावितरण कंपनीचे ११/३३ के.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्र आहे. सदर ठिकाणी उपकेंद्राच्या परीसरामध्ये ग्राहकांच्या सोईसाठी ऑफिस आहे. उपकेंद्राच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. परंतु सदरचे गवतचे उन्हामुळे वाळले आहे. काल सायंकाळी ५.३० ते ६.०० च्या दरम्यान शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीच्या ठिणग्या खाली पडल्याने विद्यानगरच्या बाजूने मोठ्या गवताला आग लागली. परिसरातील नागरिकांनी धुराचे लोट पाहून भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच महावितरण उपकार्यकारी अभियंता संजय बालटे, सहाय्यक अभियंता मेहबूब होबाळे, प्रदीप माने, राहुल मदने यांनी याठिकाणी धाव घेत. आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे, प्रशासकीय अधिकारी शांतप्रसाद पुंदे, प्रसाद नलवडे, संतोष सोहनी, बाळासाहेब खंदारे, सुनील वाघमारे यांनी या ठिकाणी धाव घेत आग नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अधिकाऱ्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
महावितरण कंपनीचे ११/३३ के.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्र या ठिकाण असल्याने अधिकाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व कोरड्या गवताच्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोका उघड झाला असून, स्थानिकांकडून सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे.
सूचना न देता वीज खंडित
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून वीजेची मागणी वाढत आहे. परंतु शहरात अनेकवेळ कोणतीही पूर्वसूचना न देताना वीज खंडीत होत आहे. दिवसातून वारंवार वीज खंडित होत असल्याने, व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.