आटपाडी : नेत्यांच्या अतिक्रमणावर अगोदर कारवाई करा, मगच सर्वसामान्यांना नोटीसा द्या ; मुलभूत सुविधा देण्याच्या नावाने बोंबाबोंब

0
153

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये वाढलेले अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमण केलेल्यांना नगरपंचायतीने नोटीसा पाठवल्या आहेत. पंधरा दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नगरपंचायत कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे. परंतु नगरपंचायतीने नेत्यांच्या अतिक्रमणावर अगोदर कारवाई मगच सर्वसामान्यांना नोटीसा द्यावेत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

आटपाडी शहरातील ओढापात्र, सार्वजनिक जागा, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पक्की किंवा पत्राशेडचे अतिक्रमणे करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिलेल्या नोटिसामध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ आणि ५३ अन्वये सार्वजनिक ओढा पात्रांसह सार्वजनिक जागेतील अतिक्रमणे नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसात स्वतःहून काढून न घेतल्यास नगरपंचायत प्रशासन कारवाई करेल.

आटपाडी शहरात दोन ओढे आहेत. तलावाच्या सांडव्यापासून शुक ओढा आणि आंबाबाई मंदिरापासून एक हे दोन्ही ओढ्यांवर शेतकऱ्यांसह अनेक धनदांडग्यांनी नेतेमंडळीनी मोठी अतिक्रमणे केली आहेत. काही ठिकाणी ओढापात्रच संपुष्टात आले आहे. चौंडेश्वरी कॉलनी जवळील ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पक्की घरे बांधण्यात आलेली आहेत. शहराच्या सार्वजनिक जागांवर, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.

नगरपंचायतने शहरातील सुमारे ११७ अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये ओढापात्रालगतची पक्की व कच्ची बांधकामे, पत्र्याचे शेड, रस्त्याच्या कडेचे अतिक्रमणातील व्यवसायिकांचा समावेश आहे. दरम्यान नोटिसा दिल्याने सध्या मोठी खळबळ माजली आहे. आटपाडी नगरपंचायतचे प्रशासन, मुख्याधिकारी व प्रशासक खरेच या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारणार का? फक्त नोटिशीचा फार्सच होणार ? याबाबत तर्क वितर्क वर्तवले जात आहेत.

 

नेत्यांच्या अतिक्रमनावावर कारवाई होणार का ?

दरम्यान आटपाडी शहरातील ओढा पात्रा मध्ये काही बड्या राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली असून या ओढा पात्रच संपुष्टात आणले आहे. तर एका ठिकाणी अतिक्रमण करून रस्ताच अडवण्यात आल्याच्या चर्चा होत आहेत. या अतिक्रमण धारकावर ही कारवाई होणार का? असा सवाल सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here