माणदेश एक्सप्रेस न्युज : बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकापासून ते सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून याप्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यातच आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी पत्रकारांशी बोलताना सीआयडीलाही सवाल केले आहेत. यासोबतच अंजली दमानिया यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, एकतर सीआयडी आणि एसआयटीची चौकशी जी होती ती संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसाठी होती. खंडणीचे आरोप शोधण्यासाठी नव्हती. असे असताना सीआयडीने वाल्मिक कराड यांना अटक काय ग्राउंडवर केली. खंडणीमध्ये सीआयडी होतं का हा माझा पहिला प्रश्न आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
दुसरा प्रश्न म्हणजे मी जी पीसीआरची कॉपी वाचली, त्याच्यात सरळ सरळ असं लिहिलंय की वाल्मिक कराड हे बोलणार आहेत, असं सांगून अवादाच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला होता आणि सगळीकडची काम तुमचे बंद करा. मला दोन कोटी रुपये नाहीतर… तुम्ही मला जोपर्यंत ते देणार नाही, आवाजाच्या कुठलंही काम संपूर्ण बीड जिल्ह्यात तुम्हाला सुरू करता येणार नाही. असं जे म्हटलं गेलं आणि त्या व्यतिरिक्त अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
म्हणजे जर मे मध्ये हे प्रकरण इतकं गंभीर झालं होतं, त्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं. तर त्यावेळेस जर ही कारवाई झाली असती, तर संतोष देशमुख यांचे प्राण कधीच केले नसते. खंडणीची जी मागणी होती, ती मे महिन्यापासून होती. एका अधिकार्याचे अपहरण देखील केलं गेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी एकच आहे. चाटे आणि जे जे माणसं होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम केलं होतं, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.