
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : टीम इंडिया पुढील महिन्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) अचानक निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. विराट कोहलीनेही इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं यासंदर्भात बीसीसीआयलाही माहिती दिल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलंय. मात्र, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
“त्यानं आपला निर्णय घेतला आहे आणि आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची महिती त्यानं बोर्डाला दिली. बीसीसीआयनं त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या विनंतीवर त्यानं उद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.”
रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीनं हा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची काही दिवसांत बैठक पार पडणारे. असं मानलं जातंय की कोहली या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून आपल्या कसोटी भवितव्याचा विचार करत आहे. कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या कसोटीत शतक झळकावलं होतं, पण त्यानंतर तो सातत्याने अपयशी ठरला आणि त्याच पद्धतीनं बाद झाला.
जर विराट कोहलीने आपला विचार बदलला नाही तर त्याच्या आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचा अननुभवी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टॉप ऑर्डरमध्ये शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सारखे खेळाडू आणि रिषभ पंत मधल्या फळीत असण्याची शक्यता आहे.