ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही; ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागतच – सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका

0
46

पुणे (प्रतिनिधी) – आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी येथे रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडतानाच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले.

सुळे म्हणाल्या, “विकासकामांमध्ये कुठलेही राजकारण होऊ नये. हिंजवडीतील रस्त्यांची दुरवस्था गंभीर असून, याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागून पत्रव्यवहार देखील केला आहे, पण अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.”

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर सुळे यांची मनापासून प्रतिक्रिया

राज्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या ५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या:

“ठाकरे हे फक्त आडनाव नाही, तर एक ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली, ते योगदान आजही प्रेरणादायी आहे. कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर त्यांचे मनापासून स्वागत करते.”

शरद पवार म्हणाले – “मी जाणार नाही”

या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं की, “माझे कार्यक्रम दुसरीकडे असल्यामुळे मी त्या मेळाव्याला जाणार नाही.” मात्र, त्यांनी पक्षाच्या निर्णयाचा आदर असल्याचं सांगितलं. “जयंत पाटील यांनी सहभागाची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंमुळे राजकीय समीकरणांवर परिणाम?

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या अनेक वर्षांनंतर होणाऱ्या एकत्रित मेळाव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात एकजुटीचा हा प्रयत्न मानला जातोय. अशा वेळी सुप्रिया सुळे यांच्या ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ दिलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here