ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारची माघार; ही विजयाची फक्त पहिली पायरी – संजय राऊत

0
94

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : हिंदी सक्तीच्या निर्णयावरून ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मोठा परिणाम राज्य सरकारवर झाला असून, या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. “ही विजयाची पहिली पायरी आहे. यापुढे मराठीसाठी अशाच एकजुटीने लढत राहणार आहोत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

 

राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची हाक दिल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोघं एकत्र येणार म्हटल्यावर सरकार हादरलं. मराठी ताकद काय असते याची जाणीव सरकारला झाली आणि त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.”

 

 

“फडणवीस-शिंदे एकत्र येऊ शकतात, प्रफुल पटेलसोबतही भाजपचं जमून येतं, मग दोन भाऊ एकत्र आले तर एवढं पोटदुखं का?” असा सवाल करत राऊतांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. “कधीकाळी एकनाथ शिंदे फडणवीसांना भ्रष्टाचारी म्हणायचे. आज दोघं एकत्र आहेत. मग भूतकाळ आम्हालाच का दाखवता?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

 

 

हिंदी सक्तीवरील माघारीचा निर्णय फडणवीसांनी शहाणपण दाखवून घेतला, अशी टीका करत राऊत म्हणाले, “राज-उद्धव ठाकरे यांच्या मोर्च्याची घोषणा झाल्यावरच सरकारने धसका घेतला. लाखो मराठी नागरिक रस्त्यावर येणार होते. त्यामुळेच त्रिभाषा सूत्र मागे घेण्यात आलं.”

 

 

राज-उद्धव यांचा मेळावा म्हणजे मराठी एकतेचा विजय

५ जुलै रोजी होणारा ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा हा सरकारच्या विरोधातील शक्तिप्रदर्शन ठरणार होता. “हा मेळावा केवळ दोन पक्षांचा नाही तर संपूर्ण मराठी जनतेचा आहे. प्रत्येक घटक, लहान-मोठ्या संघटना सहभागी होणार आहेत. हे मराठी अस्मितेचं प्रतीक ठरेल,” असं राऊत म्हणाले.

 

 

‘माशेलकर अहवाल टेबलवर ठेवा’ – भाजपवर पलटवार

भाजपकडून वारंवार उद्धव ठाकरे सरकारने त्रिभाषा सूत्र स्वीकारल्याचा आरोप करण्यात येतो. त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, “फडणवीस खोटं बोलत आहेत. दिल्लीतील मोदी-शाह खोटं बोलतात, तसंच राज्यात फडणवीसही खोटं बोलतात. माशेलकर अहवाल काय आहे, तो टेबलावर ठेवा. हवेत तीर मारू नका.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here