
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पंढरपूर : उजनी व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पंढरपूर शहराला भीमा नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असून, जुना दगडी पूलही पाण्याखाली जाऊ शकतो, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
उजनी धरणातून ३१,६०० क्युसेक आणि वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या विसर्गामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जात आहेत. तसेच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठ परिसरात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात केल्या आहेत.
नीरा व भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्याच्या स्थितीत भीमा नदीपात्रात ४०,००० क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीवरही हवामान विभागाने उंच लाटांचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट व सातारा घाट परिसरात पुढील २४ तास ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही कृष्णा, वारणा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांना आवाहन:
नदीकाठच्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्राजवळ न जाणे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आणि आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.