
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मेळावा रविवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कधीही खंडित होऊ दिली जाणार नाही. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवरील बंदी उठवण्यात आलेली असून, मोठ्या मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबत शासन ३० जूनपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मेळाव्याला अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, संजय उपाध्याय, माजी आमदार मधु चव्हाण, जयेंद्र साळगावकर (अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ अध्यक्ष), जितेंद्र राऊत (मूर्तिकार संघटना अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“गणेशोत्सवावर बंदी घालण्याचे षड्यंत्र!”
आपल्या भाषणात शेलार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेवर थेट आरोप करत म्हटले की, “शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्यानुसार या पक्षांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. २००३ साली नैसर्गिक जलस्त्रोतांवरील हिंदू विधींविरुद्ध याचिका दाखल करून या षड्यंत्राची सुरुवात झाली होती.”
आदित्य ठाकरेंवर थेट टीका
शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करत सांगितले की, “२०१८ च्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात पीओपी मूर्तींवर बंदी आणि शाडू मातीला प्रोत्साहन देणारी तरतूद करण्यात आली होती. हा निर्णयही शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्यानुसार घेतला गेला होता, असे त्यांनी ठामपणे सांगितले.”
भाजपचा निर्धार
गणेशोत्सव हे हिंदू संस्कृतीचं प्रतीक असून, कोणत्याही दबावाखाली सार्वजनिक गणेशोत्सव बंद होऊ दिला जाणार नाही, असा निर्धार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. शासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि न्यायालयात आपल्या भूमिकेचे प्रबळ समर्थन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.