
विविध नेत्यांची उपस्थिती, मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : सध्या ग्रामीण भागात लग्नसराईला सुरुवात झाली असून, दररोज कुठे ना कुठे लग्नाची गाणी, बँड-बाजा, वाजंत्रींचे स्वर गूंजताना ऐकू येत आहेत. विवाह हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून तो संस्मरणीय, आनंददायी व्हावा, अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते.
या मंगलमय वातावरणात राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. विविध लग्न समारंभांना राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरत असून, ही उपस्थिती मतदारांशी संवाद साधण्याचे, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे आणि सामाजिक व राजकीय संबंध दृढ करण्याचे माध्यम ठरत आहे.
खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर, अमोल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, सभापती संतोष पुजारी, स्वाभिमानचे भारतदादा पाटील, दत्तात्रय पाटील पंच, युवा नेते विनायक मासाळ, आरपीआयचे राजेंद्र खरात, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे विनायककाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिलशेठ पाटील, चौंडेश्वरी पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख चंद्रकांत दौंडे हे विविध लग्न समारंभांना हजेरी लावत आहेत.
एका मुहूर्तावर अनेक विवाह ठरत असल्यामुळे नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करत उपस्थित राहावे लागत आहे. वधू-वरांना आशीर्वाद देताना अनेक नेत्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. मात्र या धावपळीतूनही मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा होत आहे. विकासकामांसाठी निधी कुठून आणता येईल, स्थानिक अडचणींचे समाधान कसे करता येईल, यावरही विचारमंथन सुरू आहे.
या निमित्ताने विविध पक्षातील नेत्यांमध्ये संवाद, मैत्री व सहकार्याचा एक नवा धागा तयार होताना दिसत आहे. विवाह सोहळे हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता, राजकीय आणि सामाजिक साखळी घट्ट करणारे मंच ठरत आहेत.