
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. घडलेल्या प्रकाराचे फोटोही व्हायरल झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका महिलेला गावातील ध्वनीप्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली, आणि नंतर तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो. एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी तसेच त्यांना कठोर शासन करा,” असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला दिले आहे.