
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले.
चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरविले जाते. बाबासाहेबांनी लोकशाही, सामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
राज्यपाल महोदयांनी सांगितले की, प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले.इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.