
विभागात कोकणची बाजी : लातूर विभाग सर्वात कमी निकाल
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र बोर्डाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत.
महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. यातील १४ लाख १७ हजार ९६९ हे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे.
बारावीचा निकालात विभागनिहाय आकडेवारी नुसार कोकण विभाग अव्वल आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका आहे.
सर्व विभागीय मंडळातून नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. बारावीत एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत.
बारावी बोर्ड २०२५ चा विभागनिहाय निकाल
कोकण -९६.७४
कोल्हापूर – ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६