
माणदेश एक्प्रेस न्यूज|नवी दिल्ली: देशात ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चांना सध्या जोरदार उधाण आलं आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील विविध दावे केले जात असून, अनेकांना यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, सध्या जरी नोटा रद्द करण्याचा कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी येत्या काळात – विशेषतः मार्च २०२६ पर्यंत – ५०० रुपयांच्या नोटा हळूहळू चलनातून बाद केल्या जाऊ शकतात. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००० रुपयांच्या नोटांप्रमाणे एकदम बंदी न घालता, या नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून हटवल्या जातील.
५०० रुपयांच्या नोटा बंद करण्यामागील संभाव्य कारणं:
काळ्या पैशावर नियंत्रण: आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ५०० च्या नोटा सापडत आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय होऊ शकतो.
भ्रष्टाचारावर लगाम: मोठ्या रकमेच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये प्रामुख्याने मोठ्या मूल्याच्या नोटांचा वापर केला जातो. त्यावर मर्यादा आणण्यासाठी सरकार हा पाऊल उचलू शकते.
डिजिटल व्यवहारांना चालना: सरकार डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत UPI, कार्ड पेमेंट्ससारख्या डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देत आहे. मोठ्या नोटा कमी केल्यास डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढू शकते.
RBI काय म्हणतं?
रिझर्व्ह बँकेने ५०० च्या नोटांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांची वाट पाहावी, असं आवाहन करण्यात येत आहे. जर भविष्यात नोटा बंद झाल्या, तर २००० च्या नोटांप्रमाणेच त्या बँकेत जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असं तज्ज्ञ सांगतात.