‘भारतात हजारो पाकिस्तानी आले कुठून?; ठाकरेंच्या सेनेचा सवाल

0
153

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : “पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार भांबावल्यासारखे वागत आहे. एरवी राजकारण, कारस्थाने करण्यात वेळ घालवायचा आणि असा हल्ला झाला की, झोपेतून जागे व्हायचे. तसेच आताही झाले आहे. देशातील पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात हाकला या मोहिमेचा शुभारंभ केंद्र सरकारने केला खरा; पण जेथे वर्षानुवर्षे भाजपची सत्ता आहे तेथेच सर्वाधिक पाकिस्तानी सापडत आहेत. म्हणजे इतकी वर्षे या लोकांनी झोपाच काढल्या हे नक्की. पुन्हा जेथे भाजपची सत्ता नाही किंवा आहे तेथे मुसलमान विद्यार्थी, फळवाले, भाजीवाले, कपडेवाले, लहान-मोठे व्यावसायिक यांना पाकिस्तानी नागरिक ठरवून त्यांना त्रास देण्याच्या मोहिमा सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे मूळ पाकिस्तानी नागरिक, घुसखोर राहिले बाजूला; वेगळेच उद्योग सुरू झाले आहेत,” असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे.

 

“मुळात हजारोंच्या संख्येने पाकड्यांनी हिंदुस्थानात येऊन का राहावे आणि आपल्या देशानेही त्यांना येऊ का द्यावे? आपण पाकिस्तानला शत्रुराष्ट्र मानतो ना, मग देशाच्या प्रत्येक राज्यात इतक्या प्रचंड संख्येने पाकिस्तानी नागरिक वैध, अवैध मार्गाने का येऊ दिले गेले? बरं, यापैकी किती पाकिस्तानी नागरिकांकडे व्हिसा व अन्य वैध कागदपत्रे आहेत व किती लोक बेकायदेशीरपणे घुसखोरी करून हिंदुस्थानात राहत आहेत, हादेखील संशोधनाचा विषय आहे. हिंदुस्थानात वास्तव्यास असलेल्या हजारो पाकिस्तान्यांमध्ये सिंध प्रांतातून आलेले हिंदू किती व मुस्लिम किती, याचीही बारकाईने पडताळणी व्हायला हवी,” अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

 

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अशी परस्परविरोधी माहिती देत असतील तर जनतेने विश्वास तरी कुणावर ठेवायचा? सीमेवर सुरक्षा दलांचा खडा पहारा असताना या घुसखोरांनी बिळे कशी केली? देशाचे पंतप्रधान स्वतःला जनतेचा चौकीदार म्हणवून घेतात; पण सीमेला भगदाडे पाडून पाकिस्तानी नागरिक, घुसखोर, अतिरेकी सीमा ओलांडून हिंदुस्थानात येत असतील, देशाच्या कुठल्याही राज्यात जाऊन आरामात राहत असतील व पहलगामसारखे हल्ले आणि हत्याकांड घडवून गायब होत असतील तर सरकार नावाची यंत्रणा, देशाचे गृहखाते व गुप्तचर यंत्रणा नेमके काय करीत आहेत?” असा थेट सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

 

“महाराष्ट्रातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होते. त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 2 हजार 458 पाकिस्तानी एकट्या नागपूर शहरातच असल्याचे समोर आले. नागपूर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले शहर, पण नागपुरातच अडीच हजार पाकिस्तानी राहत असतील व त्यापैकी सुमारे 30 पाकिस्तान्यांची कुठलीच माहिती पोलीस प्रशासनाकडे नसेल तर देशाबरोबरच महाराष्ट्राचीही सुरक्षा रामभरोसेच आहे, असे म्हणावे लागेल,” असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here