
माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोकण : मे महिन्यातच कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न झाला असून, यावर्षी मान्सूनही अपेक्षेपेक्षा लवकरच दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणातील विविध धबधबे जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांच्या मोहक दृश्यांनी पर्यटकांना भुरळ घातली असून, विविध भागांतून पर्यटक कोकणात दाखल होऊ लागले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेला सवतकडा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सुमारे हजार फूट उंच असलेल्या या धबधब्याचे सौंदर्य, त्याच्या दोन टप्प्यांमध्ये पडणाऱ्या पाण्यामुळे अधिक खुलते. या परिसरातील स्लेटसदृश खडक, डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल यामुळे हे ठिकाण वर्षा पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
सध्या या भागात एकाच ओढ्यावर ३ ते ४ लहान-मोठे धबधबे प्रवाहित असून, निसर्गप्रेमींना ते विशेष आनंद देत आहेत. धबधब्याचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. स्थानिक पर्यटन व्यवसायिकांनाही याचा फायदा होत असून, हॉटेल, गाईड सेवा आणि वाहन व्यवस्था यांना मागणी वाढत आहे.
जूनपासून सुरू होणारा हा पर्यटकांचा ओघ गणपती उत्सव आणि दिवाळीपर्यंत कायम राहतो. त्यामुळे कोकणातील धबधबे केवळ निसर्गप्रेमींसाठीच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही वरदान ठरत आहेत.