
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे : वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात आत्महत्या की खून? या मुख्य प्रश्नावर अजूनही सुस्पष्ट उत्तर मिळालेले नाही. मात्र, या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैष्णवीने गळफास लावला, असा प्राथमिक दावा करण्यात आला होता, परंतु आता पोलिसांनी त्या पंख्याची फॉरेन्सिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही चाचणी पंख्याची वजन सहन करण्याची क्षमता आणि वैष्णवीच्या शरीराच्या वजनाचा ताळमेळ पाहून करण्यात येणार आहे. जर पंखा त्या भाराने वाकत असेल किंवा न तुटता टिकत असेल, तर आत्महत्येची शक्यता प्रबळ होईल. मात्र, काही विसंगती आढळल्यास खूनाचा संशय बळावण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात वैष्णवीच्या खासगी आयुष्याशी संबंधित काही बाबीही चर्चेत आहेत. एका तरुणाशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्या तरुणाचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे मानसिक तणावातून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा युक्तिवाद आरोपी पक्षाकडून करण्यात आला आहे.
तथापि, वैष्णवीच्या कुटुंबियांनी हा थेट खून असल्याचा आरोप केला असून, पोलीस तपासावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
फॉरेन्सिक चाचणी अहवाल पुढील काही दिवसांत प्राप्त होणार असून, तो अहवाल या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा निर्णायक भाग ठरणार आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे आता या प्रकरणातील सत्य लवकरच उजेडात येण्याची शक्यता आहे.