
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई – ठाण्याजवळील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी एक भीषण रेल्वे अपघात घडला. धावत्या लोकल ट्रेनमधून आठ प्रवासी ट्रॅकवर पडले असून त्यापैकी पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून ही घटना घडली. याचवेळी समोरून सीएसएमटीकडे जाणारी दुसरी लोकल येत होती. दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना, प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गर्दीमुळे अपघाताचा संशय
ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती आणि प्रवासी दरवाज्याजवळ लटकत असल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, एकाच वेळी आठ प्रवासी ट्रॅकवर पडल्याची नोंद झाली आहे. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रशासनाची तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दिवा आणि मुंब्रा येथून तातडीने रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. जखमींना वेळीच वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही दुर्घटना कसारा फास्ट लोकलमधून घडली असून संबंधित गार्डकडून माहिती मिळताच तातडीची मदत पाठवण्यात आली. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.”
सेवांवर परिणाम, नागरिकांमध्ये संताप
या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या स्थानिक सेवा काही काळ विस्कळीत झाल्या. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण होते. सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.