विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; सर्व्हर डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज ठप्प

0
48

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली : राज्य सरकारच्या महा-आयटी विभागाच्या सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे सेतू आणि महा-ई-सेवा केंद्रांमधील सर्व्हर गेल्या आठ दिवसांपासून डाऊन झाल्याने जिल्ह्यातील शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना बसत असून, अनेक शासकीय दाखले व प्रमाणपत्रांच्या कामकाजात खोळंबा निर्माण झाला आहे.

 

जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र यांसारख्या अनेक महत्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अधिकाऱ्यांना लॉगिनही करता येत नसल्याने हे दाखले प्रलंबित आहेत.

 

सेतू कार्यालयात सध्या प्रचंड गर्दी असून, नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज तसेच परीक्षांच्या नोंदणीस अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आमच्या मुलांचे भविष्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे अंधारात जात आहे,” असा आरोप काही पालकांनी केला आहे.

 

महा-आयटीच्या सर्व्हरवरच राज्यातील सर्व माहिती साठवली जात असल्याने एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास संपूर्ण व्यवस्थाच कोलमडते, हे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here