
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|बारामती– महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला असून महिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण आणि उन्नतीसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक महिलांना कर्ज धनादेशांचे वाटप करण्यात आले.
पवार म्हणाले, यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दी वर्ष तसेच छत्रपती महाराणी ताराबाई यांचे ३५० वे जयंती वर्ष राज्य शासनाने विविध कार्यक्रमांनी साजरे करण्याचे ठरवले आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली वारसा आहे. त्यांच्या आदर्शावर चालणे हीच खरी त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य आणि दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळात उभारलेले घाट, बारव दुरुस्त करण्याचे काम राज्य शासन हाती घेत आहे. ७ लाख नवीन बचतगट स्थापनेचा आणि बचत गटांच्या फिरत्या निधीमध्ये ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी माहिती दिली की, यंदा बारामती तालुक्यातील बचतगटांना सुमारे ३ कोटी १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले गेले असून १ कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज मंजुरी आदेश वितरित केले गेले आहेत.