
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील गट नंबर 574 मधील शेतजमिनीत नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा निचरा अडवणारा बांध हटवण्याचे आदेश असतानाही संबंधित शेतकऱ्याने बांध कायम ठेवून शासनाच्या आदेशाचा अवमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नितीन विष्णू सानप (वय २५, ग्राम महसूल अधिकारी, रा. आटपाडी) यांनी फिर्याद दिली असून, धोंडीराम राव गायकवाड (वय ७०, व्यवसाय – शेती, रा. शेटफळे, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १६ मे २०२५ रोजी शेटफळे गावातील गट नंबर 574 मधील शेतात महसूल विभागाने स्थळ पाहणी करून पंचनामा केला होता. या वेळी पश्चिम बाजूस मोठा बांध घालून नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी संबधित अधिकाऱ्यांनी हा अडथळा दूर करण्याचे आदेश आरोपीस दिले होते. मात्र त्यांनी तो आदेश पाळला नाही, त्यामुळे शासनादेशाचा अवमान झाल्याची तक्रार आहे.सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
#शासनादेशाचाअवमान #शेटफळे #आटपाडी #शेतकरीआंदोलन #गुन्हा #MandeshNews #TehsildarOrderViolation #RuralJustice