
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. ८ मे पासून लागोपाठ तीन दिवस पाकिस्तानच्या लष्कराकडून भारतीय सीमेवरील राज्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंत पसरलेल्या सीमेवर ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र डागणे आणि लढाऊ विमानांमधून ठिकठिकाणी हल्ले सुरू आहेत. भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले असून अनेक ड्रोन, क्षेपणास्त्र निकामी केले आहेत. या सर्व घडामोडींवर देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अनुभव शरद पवारांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली.
भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचा आवाहन केले जात आहे. भारतानेही केवळ पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. भारताने स्वतःहून नागरी भागांना लक्ष्य केले नाही. पण पाकिस्तान जाणूनबुजून नागरी भाग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, गुरुद्वारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर बॉम्ब टाकत आहे.
माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना बारामतीमध्ये भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “यामध्ये जास्त बोलायचे नसते तर थेट ॲक्शन घ्यायची असते.” शरद पवार यांच्या विधानातून भारतातील विरोधी पक्षांनी संयमीपणा दाखवत केंद्र सरकारला एकमताने पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, माजी मंत्री हे आंतरराष्ट्रीय माध्यमांना वारंवार मुलाखती देऊन भारताच्या नावाने गळे काढत आहेत. मात्र त्यांचा खोटारडेपणा रोजच्या रोज उघडा पडत आहे. दुसऱ्या बाजूला भारताकडून एकाही राजकीय नेत्याने माध्यमांना मुलाखती देऊन तणावावर भाष्य केलेले नाही. भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका अधिकृतपणे मांडण्यात येत आहे.(स्त्रोत-लोकसत्ता)