
माणदेश एक्सप्रेस न्यूज : पुणे : ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाच्या नुसत्याच चर्चा सुरू असतानाच इकडे राष्ट्रवादीत मात्र थोरले पवार पक्ष विलीन करणाचा निर्णय पुढच्या पिढीवर सोपवून मोकळे देखील झालेत. होय हे खरं आहे. आज स्वत: शरद पवार यांनीच पुण्यात पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
‘ऑफ द रेकॉर्ड’ शरद पवार काय म्हणाले?
होय, आमच्यातील काहींना पुन्हा एकत्र यावसं वाटतंय, हे खरंय. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात हे सगळे पुन्हा एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. आता मी या निर्णय प्रक्रियेत नाही, पण सध्याच्या नेतृत्वानेच एकत्र बसून विलीनीकरणाबाबतचा निर्णय घ्यावा. शरद पवार यांच्या या गुगलीने त्यांच्याच पक्षातले नव्हे तर घरातलेच पुरते घायाळ झाल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, शरद पवार यांच्या या राजकीय गुगलीचा त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला आहे. शरद पवार यांची नेमकी विचारधारा काय आहे एकदा त्यांनाच विचारलं पाहिजे, असा चिमटा राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढला आहे.छगन भुजबळ यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंद होईल असं म्हटलं आहे. तर नुकतेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात दाखल झालेल्या उमेश पाटलांना काही नेत्यांचा इगो आडवा येईल, असं वाटत आहे.
सुप्रिया सुळे खरंच पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का?
राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत नेहमी असं म्हटलं जातं की ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. किंबहुना सत्तेसाठीच हा पक्ष जन्माला आल्याचा आरोपही नेहमीच होत आला आहे. म्हणूनच शरद पवार गटातले काही आमदार पवारांवर पुन्हा अजितदादांसोबत जाण्यासाठी दबाव टाकत आहेत. सोलापूरच्या आमदारांनी तर तसं पत्र ही लिहिल्याचं बोललं जातं आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या तर पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या अनेकांची अडचण होणार. कारण अजित पवार हे सध्या हिंदुत्ववादी भाजपसोबत घरोबा करून बसलेत. म्हणूनच सुप्रिया सुळे खरंच पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का हे बघावे लागेल. कारण पवारांच्या सूचक सल्ल्यानुसार यासंबंधीचा निर्णय हा आता त्यांनाच घ्यायचा आहे. बघुयात पवार घराणे राजकीय दृष्ट्या पुन्हा एकत्र येतात का हे बघावे लागेल.