
माणदेश एक्सप्रेस न्युज|नाशिक — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये चित्तपावन ब्राह्मण संघाच्या ‘श्री परशुराम भवन’ या नूतन वास्तूच्या लोकार्पणावेळी दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याला मोठे महत्त्व दिले. त्यांनी हिंदू असण्याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करत, एकात्मतेचा संदेश दिला.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासात चित्तपावन ब्राह्मण समाजाने प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य ते भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि कला-साहित्य क्षेत्रातील कार्य हे सर्व या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण आहे.”
ते पुढे म्हणाले, “समाजात जातीव्यवस्था नाहीशी व्हावी, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जातीय विषमता दूर करणे सर्वांच्या जबाबदारीत आहे. ब्राह्मण समाज दूधात साखरेसारखा आहे, जिथे चिमूटभर साखरेमुळे दूध गोड होते तिथे समाजात गोडवा निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.”
फडणवीसांनी हिंदुत्वाचा गौरव करत पंतप्रधान मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या मंत्राचा संदर्भ देत म्हटले, “आपण सनातन विचारांचे वारसदार आहोत आणि केवळ जाती-पंथाचा विचार न करता एकत्वाची भावना मनात ठेवणे गरजेचे आहे.” कार्यक्रमात त्यांनी नव्या पिढीने या ऐतिहासिक वारशाला पुढे नेण्याचे आवाहनही केले.