
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई – नागपूर ते मुंबई दरम्यानचा अखंडित प्रवास आता प्रत्यक्षात साकारतोय. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा – इगतपुरी ते आमने (७६ किमी) – ५ जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
७०१ किलोमीटर लांबीच्या या प्रवेशनियंत्रित महामार्गाचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचा ६२५ किमीचा टप्पा प्रवासी सेवेत होता. आता उर्वरित ७६ किमीचा डोंगराळ भागदेखील खुला झाल्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास केवळ ८ तासांत पार करता येणार आहे.
या टप्प्यातील वैशिष्ट्य म्हणजे ५ बोगद्यांचा समावेश, ज्यांची एकत्रित लांबी ११ किमी आहे. यातील इगतपुरी बोगदा ७.७८ किमी लांब असून, तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा रोड बोगदा ठरतो. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर केवळ ८ मिनिटांत पार करता येईल.
समृद्धी महामार्गाची प्रगती – एक नजर:
डिसेंबर २०२२ : नागपूर ते शिर्डी (५२० किमी) पहिला टप्पा सुरू
दुसरा टप्पा : शिर्डी ते भरवीर (८० किमी) वाहतुकीसाठी खुला
तिसरा टप्पा : भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) सुरू
आता अंतिम टप्पा : इगतपुरी ते आमने (७६ किमी) ५ जूनपासून सुरू
या महामार्गाचे एप्रिलमध्येच काम पूर्ण झाले होते. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव होता, मात्र वेळेअभावी कार्यक्रम लांबला. अखेर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा महामार्ग केवळ प्रवासालाच गती देणार नाही, तर राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना देणार आहे.