
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. फास्ट लोकल ट्रेन एकमेकांच्या शेजारून जात असताना हा अपघात झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमठू लागल्या आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या अपघातावर संताप व्यक्त करत, या घटनेसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी होती, “या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईमधील रेल्वे कशी चालते हे जगाला आश्चर्य आहे. रेल्वेमंत्री राजीनामा मागण्याऐवजी त्यांना घटनास्थळी जाऊन परिस्थिती बघायला हवी,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, “मुंबईमध्ये केवळ रेल्वेचं नव्हे, तर रस्त्यांचं, पार्किंग व्यवस्थेचंही मोठं संकट आहे. शहराची अराजकता वाढत आहे. मेट्रो आणि मोनोरेल असले तरी त्याचा उपयोग केवळ काही भागांमध्ये होतो. बाहेरून येणारे लोक, गर्दी, रस्त्यांवरील अपुरी व्यवस्था, या सर्वांचा विचार करून केंद्र सरकारने रेल्वे सुरक्षा आणि शहरी नियोजनावर लक्ष द्यायला हवं.”
राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की, “माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा तशीच अनियंत्रित झाली आहे. गर्दी, सुरक्षा आणि सफाई यामध्ये दुरुस्तीची गरज आहे.” मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांवर राज ठाकरे यांनी जोरदार चिंता व्यक्त केली असून, ते म्हणाले की, “रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारने यावर तातडीने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. रेल्वेमंत्री अपघातावर शांत बसून राहता कामा नये, त्यांना तिथं जाऊन परिस्थिती पाहायला हवं.”
रेल्वे अपघातामुळे लोकल सेवेला मोठा धक्का बसला असून, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने अधिक तपासणी करण्याचे आश्वासन दिले असून, जखमींना मदत पुरवली आहे. याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.